
मुरूम (सुधीर पंचगल्ले)
: महात्मा बसवेश्वरांनी समाजाला क्रांतिकारी विचार दिले. त्यांनी दिलेले क्रांतिकारी विचार प्रेरणादायी आहेत. त्यामुळे नागरिकांनी थोर महापुरुषांचे विचार आत्मसात करून जीवनाची वाटचाल करावी असे कोरणेश्वर महास्वामींनी त्यांच्या प्रवचनातून व्यक्त केले. मुरूम येथील लिंगायत सेवा संघ आयोजित महाशिवरात्री व कक्कय्या महाराज जयंतनिमित्त आयोजित केलेल्या तीन दिवशीय प्रवचन सोहळा शुक्रवारी (ता.१७) रोजी पार पडला. कोरणेश्वर महाराज प्रवचनात म्हणाले की, मनुष्य सुखी व समृद्ध होणे गरजेचे असून समाजातील बहुतांश लोकांकडे समृद्धी आहे पण सुख नाही. ते ऐश्वर्य, आर्थिक संपन्नता याकडे धावत आहेत. त्यामुळे सुखापासून दूर होत आहेत. आजची तरुण पिढी व्यसनाधीन झाली असून ते व्यसनमुक्त होणे गरजेचे आहे. अंतर्मन व बहिर्मन शुद्ध ठेवून जात-पात, भेदभाव न मानता समाजाला एकसंघ ठेवले पाहिजे असे ते शेवटी म्हणाले. या प्रवचनात मुगळी येथील पूज्य श्री सद्गुरु महानंदाताई हिरेमठ या म्हणाल्या की, जीवनात बदल घडविण्याची क्षमता फक्त मानवातच आहे. आपण नेहमी भूतकाळ व भविष्यकाळाचा विचार करत बसतो पण त्याऐवजी वर्तमान काळाचा विचार करणे गरजेचे आहे. आयुष्यातील चुका सुधारून जगण्याची क्षमता निर्माण करण्याची आशा महिलांनी निर्माण करावी. योगी होण्यापेक्षा समाज उपयोगी होण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी धनराज धुम्मा, गौस शेख, दत्तोबा गिरीबा, हनमंत शंके, बसवराज पांढरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता देवराज संगुळगे, संतोष येवले, स्वप्निल सुतार, गुंडेराव चौगुले, उमेश प्याटे, बालाजी शिंदे, अजय बिराजदार, प्रथमेश टिकांबरे, सागर संगुळगे, निलेश मडोळे, अमोल गिरीबा आदी परिश्रम घेतले.