
तुळजापूरात श्रीमद् भागवत कथेचे आयोजन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) धाराशिव व हरे कृष्ण भक्त तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा मंगल कार्यालय तुळजापूर येथे दि. ५/८/२०२४ ते दि.११/८/२०२४ दरम्यान भव्य अशा भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. पवित्र अशा श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून कथेची सुरुवात होत असून यामध्ये दररोज दुपारी ०३.०० ते ०६.०० या वेळेत कथा, हरिनाम संकीर्तन, आरतीसह महाप्रसाद असणार आहे.
पंढरपूर येथील श्रीमान श्रवण भक्ती प्रभुजी हे सुश्राव्य अशी कथा सांगणार असून कथे दरम्यान विविध उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. आपल्या आत्मिक कल्याणसाठी श्रवण भक्ती ही सर्वश्रेष्ठ असून यानेच भगवंताचे स्मरण शक्य आहे. सर्व जीवांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी नामस्मरणाशिवाय पर्याय नाही मनुष्य जीवनात सुख, शांती, समाधान प्राप्त करण्यासाठी आध्यात्मिक ज्ञान व हरिनाम अत्यंत महत्त्वाचे आहे. शहरात पहिल्यांदाच अशा कथेचे आयोजन केले असून पंचक्रोशीतील जास्तीत जास्त सदभक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.